धारूर कृषी उत्पन्न बाजार समिती: तोलारांच्या हक्काच्या पैशासाठी आंदोलन
किल्ले धारूर कृषी उत्पन्न बाजार समिती: तोलारांच्या हक्काच्या पैशासाठी आंदोलन
किल्ले धारूर: धारूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील परवानाधारक तोलारांना गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्या तोलाईची रक्कम मिळाली नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. बाजार समितीचे पदाधिकारी आणि जिनींग चालक यांच्यातील आर्थिक व्यवहारामुळे ही रक्कम रखडली असल्याचा आरोप तोलार बांधव करत आहेत.
या संदर्भात तोलारांनी सांगितले की, तोलाईची रक्कम शेतकऱ्यांकडून जिनींग चालक कापून घेतात आणि ती बाजार समितीला देतात. ही रक्कम 15 दिवसात बाजार समितीला देणे बंधनकारक आहे. मात्र, दोन वर्षे झाली तरी ही रक्कम मिळाली नसल्याने तोलारांनी बाजार समितीकडे अनेकवेळा मागणी केली आहे. तोलारांनी असा आरोप केला आहे की, बाजार समितीचे पदाधिकारी आणि संबंधित जिनींग चालक यांच्यातील संबंधामुळेच त्यांना त्यांची हक्काची रक्कम मिळत नाही.
याबाबत तोलारांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून, त्यांनी तात्काळ दखल घेऊन त्यांची हक्काची तोलाई रक्कम अदा करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा, ते आपल्या कुटुंबासोबत आंदोलन करतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
Comments
Post a Comment