आसरडोह गावाला क्षयरोगमुक्ततेचा राष्ट्रीय पुरस्कार!
आसरडोह गावाला क्षयरोगमुक्ततेचा राष्ट्रीय पुरस्कार!
जिल्हाधिकारी कार्यालयात दिमाखदार सोहळा; सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी व आरोग्य पथकाचा गौरव
सुर्यकांत जगताप
धारूर (प्रतिनिधी): तालुक्यातील आसरडोह या गावाने क्षयरोगावर यशस्वी मात करत 'क्षयरोगमुक्त गाव' हा बहुमान पटकावला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आज, ७ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात एका विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात गावाला क्षयरोगमुक्ततेचा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या गौरवशाली क्षणी आसरडोहचे सरपंच मंगल देशमुख सरपंच ग्रामपंचायत अधिकारी आणि आरोग्य पथकातील सर्व सदस्य उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तिपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
गावाने लोकसहभाग आणि आरोग्य विभागाच्या अथक प्रयत्नातून हे यश संपादन केले आहे. नियमित तपासण्या, जनजागृती मोहीम आणि प्रभावी उपचार पद्धतींच्या अवलंबामुळे गावाला क्षयरोगमुक्त घोषित करणे शक्य झाले, असे यावेळी बोलताना सरपंच रवी गोरे यांनी सांगितले. त्यांनी ग्रामपंचायत सदस्य, आरोग्य कर्मचारी आणि गावकऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांचे कौतुक केले.
ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी सांगितले की, या यशासाठी आरोग्य विभागाने वेळोवेळी मार्गदर्शन केले आणि आवश्यक सुविधा पुरवल्या. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता वाढण्यास मदत झाली.
जिल्हाधिकाऱ्यांनी आसरडोह गावाच्या या प्रशंसनीय कामगिरीबद्दल अभिनंदन केले. ते म्हणाले की, इतर गावांसाठी आसरडोह एक आदर्श उदाहरण आहे. आरोग्य विभागाने याच पद्धतीने कार्य करून जिल्ह्यातील इतर गावेही क्षयरोगमुक्त करावीत, असे आवाहन त्यांनी केले.
या पुरस्कारामुळे आसरडोह गावासह संपूर्ण तालुक्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे. गावकऱ्यांनी या यशाबद्दल सरपंच, ग्रामपंचायत आणि आरोग्य पथकाचे अभिनंदन केले आहे.
Comments
Post a Comment